२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर संतापाची लाट पसरली. या दहशतवाद्यांना योग्य उत्तर द्यावे आणि त्यांना चिरडून टाकावे अशी मागणी सर्व देशवासीय करत आहेत. पहलगाम घटनेनंतर देशभरात पाकिस्तानविरुद्धचा रोष आणखी वाढला आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत ज्यामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. त्यानंतर आता क्रीडाविषयक मोठा निर्णय घेऊन पाकिस्तानला धक्का दिला आहे. सध्या पीएसएल म्हणजेच पाकिस्तान लीग सुपर लीग स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जात आहे. मात्र, पहलगाम घटनेनंतर भारतात पीएसएल सामने न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात पीएसएल प्रसारित करणाऱ्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान आणि पीएसला मोठा धक्का बसला आहे.
या आधी घेतलेले निर्णय
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने मोठे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर आज परराष्ट्र मंत्रालयाची बैठक झाली, ज्यामध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. अटारी सीमा देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १५०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जे पूर्वी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते किंवा ज्यांच्याशी संबंध असल्याचा संशय आहे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, सुरक्षा यंत्रणा या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेत आहेत. दहशतवादी कारवायांमागील स्लीपर सेलचाही शोध सुरू आहे.