डोंबिवली (Dombivli) , प्रतिनिधी (शंकर जाधव)
डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील औद्योगिक विभागात असलेल्या बंद पडलेल्या पोलिस वसाहतीत आता दारुड्यांचा सुळसुळाट वाढला असून, या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
१९९० च्या दशकात उभारण्यात आलेल्या या वसाहतीत पूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. एकेकाळी या परिसराला पोलिस वसाहत म्हणून ओळख मिळाली होती. मात्र २०२० नंतर इमारतींची अवस्था धोकादायक झाल्याने रहिवाशांनी स्थलांतर केले. त्यानंतर ही वसाहत पूर्णतः रिकामी झाली असून, गेल्या चार–पाच वर्षांत येथे दारुड्यांचा वावर वाढला आहे.
मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस या भग्न इमारतीत दारू पिण्यासाठी दारुडे जमतात. परिसरात रिकाम्या बाटल्या आणि कचरा दिसतो. या परिसरात काही गैरप्रकार घडण्याची शक्यता असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेने मानपाडा पोलिसांकडे केली आहे.
संजय चव्हाण, श्याम पिसके, शरद कोंढारकर, अजय घोरपडे यांसारख्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने यांच्याशी संपर्क साधून परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.
पूर्वी पश्चिम डोंबिवलीतील बावन्नचाळ परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जिथे भिकारी, दारुड्यांनी बंद बंगले ताब्यात घेतले होते. परिणामी अनेक गंभीर घटना घडल्या होत्या. अशीच परिस्थिती पूर्व डोंबिवलीतील या पोलिस वसाहतीत निर्माण होऊ नये, यासाठी याठिकाणी प्रवेशावर निर्बंध आणण्याची, जाळी किंवा पत्रे लावून सुरक्षितता वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत मनसेने व्यक्त केले आहे.