रस्त्याच्या कामात दिरंगाई आदिवासी नागरिकांचे हाल तीव्र सरकारकडून ग्रामविकासाच्या गाजावाजा होत असतानाही पेण (Pen) तालुक्यातील आदिवासी भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वाक्रुळ ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रामा ८८ ते फणसवाडी तसेच नाडे-आघाई-भोगेश्वर रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. १५ जानेवारी २०२५ रोजी कामाचा आदेश दिला गेला असतानाही तब्बल पाच महिने उलटून गेले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
१२ किलोमीटरचा रस्ता खोदून अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणं जीवघेणं ठरत आहे. या अपूर्ण रस्त्यामुळे राजमाल (नाईकवाडी), म्हेसकोंड (पानेड), जांभळ्याची वाडी, खरबाची वाडी, नाडे, निंबारवाडी, फणसवाडी, राजमाती, काटीचिवाडी आणि भोगेश्वर अशा एकूण ११ आदिवासी वाड्यांचे सुमारे ३ हजार रहिवासी पेण शहराशी संपर्क साधण्यास बाधा निर्माण झाली आहे.
पावसाळा तोंडावर असताना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास अधिक धोकादायक होणार आहे. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, वेळेत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून कामाला गती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.