शंकर जाधव
टिटवाळा (Titwala) (बल्याणी) येथे शुक्रवार, ३० मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास केबीके या खासगी शाळेच्या संरक्षक भिंतीचा काही भाग अचानक कोसळल्याने एक ११ वर्षीय मुलगा जागीच ठार, तर दोन मुले गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
शाळेच्या बाहेर खेळत असताना अचानक भिंतीचा भाग कोसळल्यामुळे अंश राजकुमार सिंग (११), अभिषेक सोहनी (८) आणि सोहेब शेख (५) हे तिघेही ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र अंश सिंग याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित दोन्ही मुले सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी पोहोचले. रहिवाशांनी यापूर्वी अनेक वेळा या भिंतीच्या कमजोर अवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
शाळेचे ट्रस्टी सुबराव खराडे यांनी मात्र, भिंत तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून ती धोकादायक नव्हती, असा दावा केला आहे. सध्या जखमी मुलांवर उपचार सुरू असून शाळा प्रशासन आणि पालक त्यांच्यासोबत आहेत.मृत अंश सिंग याला ९ वर्षांची लहान बहीण असून त्याचे वडील टेलरिंगचे काम करतात. आई गृहिणी आहे. अभिषेक हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून सोहेब शेख याला एक भाऊ व एक बहीण आहे. या सर्व मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असून केबीके शाळेत शिक्षण घेत होती.