रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB Rally) आयपीएल २०२५ चा हंगाम जिंकला. गेल्या १८ वर्षांपासून हा संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. अखेर हे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान, या विजयानंतर संपूर्ण भारतात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. बेंगळुरू शहरात अजूनही हा विजयाचा जल्लोष संपलेला नाही. दरम्यान, बेंगळुरू शहरातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे आयोजित विजयी रॅलीने आणखी वाईट वळण घेतले आहे. या रॅलीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू संघाच्या विजयानंतर, बेंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले (RCB Rally) होते. ते सर्वजण बेंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. परंतु यावेळी, येथे अचानक चेंगराचेंगरी झाली. आतापर्यंत या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नेमके कोणाचा मृत्यू झाला हे अद्याप कळलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबवरील मोठ्या विजयानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने बेंगळुरू संघाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, मोठे नेते या समारंभाला उपस्थित राहणार होते.
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्व खेळाडू यात सहभागी होणार होते. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील येणार होता. या कार्यक्रमात या सर्वांचा सत्कार होणार होता.
हे कळताच, बेंगळुरू संघाच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी काही ठिकाणी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर, गर्दी अनियंत्रित झाली आणि यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. तर यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.