Kalyan (शंकर जाधव) –
कल्याण (Kalyan) शहराची ऐतिहासिक शान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचा भाग बुधवारी (4 जून) पहाटेच्या सुमारास कोसळला. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात भिंत कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोविंदवाडी बायपासच्या दिशेने असलेली भिंत कोसळल्याची माहिती मिळताच आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत दोषींसोबत कडक कारवाईची मागणी केली.
“पावसात काम सुरू ठेवण्याची गरज काय होती? भिंत कोसळून जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण?” असे संतप्त सवाल आमदार भोईर यांनी उपस्थित केले.
येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येथे नमाजासाठी मोठी गर्दी होणार आहे, अशावेळी अशा दुर्घटनांचे गांभीर्य अधिकच वाढते.
कामाच्या निकृष्ट दर्जावर नाराजी व्यक्त करत आमदार भोईर यांनी ठेकेदाराला तातडीने उपस्थित राहण्याचा अल्टिमेटम दिला. जर ठेकेदार यायला तयार नसेल, तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात जबाबदारीपासून पळ काढण्याची टोलवाटोलवी सुरु आहे.