शंकर जाधव (Kalyan)
बकरी ईदनिमित्त कल्याणमधील (Kalyan) ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेले दुर्गामाता मंदिर तात्पुरते बंद करण्यात आल्याने, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, ७ जून रोजी शेकडो शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्यासमोर “घंटानाद आंदोलन” केलं.
शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, “प्रशासन सतत एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना जपत दुसऱ्या समाजाचे अधिकार डावलत आहे, हे दुर्दैवी आहे.” मंदिरात घंटानाद व दर्शनास मनाई केल्याने हिंदू भाविकांत संतापाचं वातावरण आहे.
माजी नगरसेवक महेश गायकवाड म्हणाले, “घंटानाद आंदोलन ही परंपरा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात १९८६ पासून सुरु आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी मंदिराला टाळं लावलं जातं, जे भावनांवर आघात आहे.”
या पार्श्वभूमीवर लाल चौकी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला, आणि किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली.
दरम्यान, बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करतात, तर हिंदू भाविक मंदिरात पूजा-अर्चा करतात. या ठिकाणी दोन्ही धर्मांची धार्मिक स्थळे असून, प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
You Might Also Like
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक महेश पाटील, अरविंद मोरे, तसेच दोन्ही गटांचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.