शंकर जाधव (Kalyan)
कल्याण (Kalyan) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत रंगतदार लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १५४ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र २ जून रोजी छाननी प्रक्रियेनंतर १४ अर्ज बाद करण्यात आले असून, आता १४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अर्ज मागे घेण्याची मुदत ३ जून ते १७ जून या कालावधीत दिली असून, या दरम्यान किती उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होणार असल्याने उमेदवारांची परीक्षा खरी लागणार आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उमेदवार प्रशांत माळी यांनी आश्वासन दिले की, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास बारामतीच्या कृषी समितीच्या धर्तीवर करणार आहे. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था असून तिला राजकारणापेक्षा विकासाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक जागांसाठी निवडणूक होत असून, त्यापैकी ११ जागा शेतकरी सेवा सोसायटी मतदारसंघातील आहेत, ४ ग्रामपंचायत मतदारसंघातून, २ व्यापारी वर्गातून आणि १ जागा हमाल-माथाडी मतदारसंघातून निवडली जाणार आहे.
१८ जून रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येतील, तर मतदान व मतमोजणी २९ जून रोजी एकाच दिवशी पार पडणार आहे.
You Might Also Like
कल्याणची बाजार समिती ही राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी एक मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही राजकीय गटांचे लक्ष लागले आहे. अनेक माजी संचालक आणि राजकीय नेत्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतल्याने राजकीय रंगत वाढली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले की, सध्या १४० उमेदवार रिंगणात असून उद्या अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर अंतिम आकडे स्पष्ट होतील.
दरम्यान, महायुती की महाविकास आघाडी – कोणाचा झेंडा कल्याण बाजार समितीवर फडकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र प्रशांत माळी यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट केले की, राजकारणापेक्षा मतदारांचा कौल महत्त्वाचा आहे. ज्या उमेदवाराला जास्त मते मिळतील, तोच विजयी होईल. विकासासाठी जनता सुज्ञ निवड करेल, अशी अपेक्षा आहे.