Dombivli (शंकर जाधव):
सुनसान इमारती किंवा रिकाम्या जागा अनेकदा दारुड्यांचे अड्डे बनतात, आणि अशा ठिकाणी भविष्यात गुन्हेगारी घडण्याची शक्यता पोलिस तपासांमधून स्पष्ट झाली आहे. अशा ठिकाणी वेळेत लक्ष दिल्यास आणि स्थानिकांकडून माहिती मिळाल्यास पोलीस वेळीच कारवाई करू शकतात.
डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात असलेली पोलिस वसाहत 2020 पासून बंद आहे. या वसाहतीत दारूच्या बाटल्या व इतर अनुचित हालचाली आढळून आल्याने येथे दारुड्यांनी अड्डा बनवल्याचे निदर्शनास आले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी – विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, श्याम पिसके, शरद कोंढारकर व अजय घोरपडे – यांनी मानपाडा पोलिस ठाण्याकडे तक्रार केली होती.
या माहितीची गंभीर दखल घेत कल्याण परिमंडळ – ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तातडीने हालचाल केली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बंद वसाहतीच्या प्रवेशद्वारावर पत्रे लावून परिसर सील करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या त्वरित कारवाईबद्दल पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांचे आभार मानले आहेत.