डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव)
डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील सुभाष रोड परिसरातील गटार दुरुस्ती आणि नवनीकरणाची कामे मागील दोन महिन्यांपासून रखडलेली असून, त्यामुळे परिसरात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळा तोंडावर असताना देखील कामे अपूर्णच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शिवसैनिक नरेंद्र म्हात्रे यांनी या बाबत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून, “सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पंधरा ते वीस सोसायट्यांमधील नागरिकांना त्यामुळे आरोग्याच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे,” असे त्यांनी सांगितले.
विश्वंभर सोसायटी, कुलकर्णी बंगला, घोलप बिल्डिंग, कागदे हॉल, मातृ प्रेरणा, देवदत्त सोसायटी अशा अनेक रहिवासी संकुलांमध्ये या रखडलेल्या कामामुळे त्रास वाढला आहे. नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नरेंद्र म्हात्रे यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असूनही, कामात प्रगती झालेली नाही. आता पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलून गटाराची कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना संभाव्य त्रासापासून वाचवावे, अशी ठाम मागणी त्यांनी व सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे.