डोंबिवली (Dombivli) (शंकर जाधव)
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली (Dombivli) शहरातील गणेशनगर – राजूनगर येथील वृंदावन सोसायटीसमोर सध्या गटाराचे सांडपाणी सरळ रस्त्यावर वाहत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पालिका प्रशासनाला गटारे व नाले सफाई पूर्ण करता आली नाही, अशी कारणे देत प्रशासनाने हात झटकले आहेत.
या परिस्थितीकडे लक्ष वेधत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डोंबिवली पश्चिम उपशहरप्रमुख संजय पाटील यांनी सदर परिसराची पाहणी केली. चार-पाच दिवसांपासून ही परिस्थिती सुरू असून, गटार सफाईसाठी केवळ एकच सक्शन गाडी असल्यामुळे विलंब होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पाटील यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याची चिंता प्रशासनाला उरलेली नाही. अवकाळी पावसात ही अवस्था असेल तर खरी पावसाळा सुरू झाल्यावर काय हाल होणार, याची कल्पनाच करवत नाही.त्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
पाटील यांच्या मते, शहरात घनकचरा कर वाढवण्यात आला असला तरी नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेबाबत पालिकेचे दुर्लक्ष लक्षात घेण्यासारखे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.