राज्य सरकारने यंदा अकरावीच्या (FYJC) वर्गांना लवकर प्रारंभ करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शिक्षण संचालनालयाने कनिष्ठ महाविद्यालयांना ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा १ जुलै २०२५, यापैकी जे आधी घडेल, त्या तारखेपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये १ जुलैपासूनच अकरावीचे वर्ग सुरू होतील, हे स्पष्ट झाले आहे.
पूर्वी शालेय शिक्षण विभागाने ६ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ११ ऑगस्टपासून वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत लांबणाऱ्या स्थितीमुळे शिक्षणात विलंब होतो, हे लक्षात घेऊन नवीन निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेपैकी ५० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करता येतील. त्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, सहाय्यक संचालक व निरीक्षक यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दहावीच्या निकालानंतर सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया काही तांत्रिक अडचणींमुळे मागे ढकलण्यात आली आहे. २१ मे २०२५ रोजी संकेतस्थळ बंद पडल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून २६ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, तर पहिली गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर केली जाणार आहे.
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असून, त्यांना वेळेवर शिक्षण सुरू करण्याची संधी मिळणार आहे.