जव्हार (Jawhar) अर्बन बँकेने अखेर दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सॅफ (Supervisory Action Framework) च्या बंधनातून मुक्तता मिळवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच ही घोषणा केली असून, यामुळे बँकेवर लादलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. परिणामी, अनेक वर्षांपासून थांबलेला लाभांश आता सभासदांना वितरित केला जाणार आहे.
२०१४ मध्ये बँकेला वाढत्या एन.पी.ए. (NPA) आणि अनियंत्रित कर्जवाटपामुळे आरबीआयने सॅफ अंतर्गत आणले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत विद्यमान संचालक मंडळ व व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेत बँकेच्या प्रशासकीय आणि आर्थिक प्रणालीत आमूलाग्र सुधारणा केल्या. एन.पी.ए. दर ३६% वरून ६% पर्यंत खाली आणण्यात यश मिळाले, तसेच बँकेला ‘अ’ श्रेणीचे ऑडिट रेटिंग मिळाले – ही मोठी आर्थिक उन्नती मानली जात आहे.
शाखा व्यवस्थापक मुरलीधर शेवाळे यांनी सांगितले की, सॅफ निर्बंधांमुळे ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता, निर्बंध हटवण्यात आले असून, बँकेच्या विकासासाठी नवे दरवाजे खुले झाले आहेत.
बँकेचे चेअरमन निलेश पाटील यांनी सांगितले, “ही केवळ सुरुवात आहे. आम्ही सभासदांना अधिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.” तर व्हाईस चेअरमन वैभव अभ्यंकर यांनी बँकेला नव्या उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला.
संचालक प्रवीण मुकणे यांनी सांगितले की, “आम्ही दिलेले वचन पूर्ण केले आहे. सभासदांना यापुढे नियमित लाभांश मिळणार असून, फोन पे आणि गुगल पे सारख्या यूपीआय सेवा लवकरच सुरू करण्यात येतील. तसेच, नवीन शाखा उघडणे आणि कॉर्पोरेट विमा एजन्सी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.”
संचालक मंडळाने ही यशस्वी वाटचाल सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या सातत्यपूर्ण विश्वास आणि पाठिंब्याचे फलित असल्याचे नमूद करून सर्वांचे आभार मानले आहेत.