कल्याण ( Kalyan) (शंकर जाधव)
कल्याण ( Kalyan) पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात ‘श्री सप्तश्रृंगी’ या धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत मदत कार्याचा आढावा घेतला.
चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्यात येणार आहे, तसेच इमारतीतील उर्वरित रहिवाश्यांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले आहेत.
मंगळवारी दुपारी झालेल्या या भीषण दुर्घटनेत चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून त्याखालील मजलेही एकामागोमाग कोसळले. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे. चार जखमींवर स्थानिक महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
दुर्घटनास्थळी घनदाट वस्तीत पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले असतानाही, चव्हाण यांनी त्वरित घटनास्थळी हजर राहून आजारग्रस्त आणि धोकादायक परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. त्यांच्या तत्पर प्रतिसादामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला.