कल्याण (Kalyan) (शंकर जाधव)
कल्याणमध्ये (Kalyan) घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, इमारतीचे छत कोसळल्याने सहा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, हे सहाय्य राज्य आपत्कालीन निधीतून तातडीने वितरित केले जाईल, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमी नागरिकांना त्वरित आणि सर्वतोपरी वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. तसेच, जीर्ण व धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
ही दुर्घटना अतिशय वेदनादायक असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले. या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिक, पालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. काही नागरिकांना वेळेवर वाचवण्यात यश आले असले तरी, सहा जीव वाचवता न आल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे.