डोंबिवली (शंकर जाधव) (Katai Dombivli)
कल्याण-शिळ (Katai Dombivli) मार्गावरील वाहतूक कोंडीसाठी दिलासा ठरणाऱ्या पलावाजवळील काटई उड्डाणपुलाचे काम ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे कामास अडथळा येत असला तरीही जून अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी आमदार राजेश मोरे यांनी स्वतः या पुलाच्या कामाची पाहणी केली आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, १ जूनपर्यंत पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पावसामुळे थोडा उशीर झाला आहे. तरीही नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जूनच्या अखेरीस हा पूल नक्की सुरू केला जाईल.
या पाहणी दौऱ्यात डोंबिवली शिवसेना शहर सचिव व विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, आमदारांचे स्वीय सहाय्यक सतीश मोडक, युवासेना पदाधिकारी रोहित म्हात्रे तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
हा पूल सुरू झाल्यानंतर पलावा परिसरातील आणि कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडीत मोठा दिलासा मिळणार आहे.