शंकर जाधव (KDMC)
कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिकेने नागरिकांवर लादलेल्या वाढीव घनकचरा संकलन शुल्काचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (५ जून) महापालिका मुख्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला.
शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने राबवलेल्या नव्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हे शुल्क वाढवण्यात आले. मात्र, ही वाढ नागरिकांच्या आर्थिक कुवतीवर आघात करणारी असल्याने मनसेने याला जोरदार विरोध दर्शवला. मोर्चादरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शुल्कवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
या आंदोलनात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, महिला जिल्हाध्यक्ष कस्तुरी देसाई, माजी नगरसेविका मंदा पाटील, कोमल पाटील, तसेच मनोज घरत, अरुण जांभाळे, संदीप (रमा) म्हात्रे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान बोलताना अविनाश जाधव यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, “कल्याण-डोंबिवलीतील जनतेच्या खिशातून जबरदस्तीने पैसे उकळून ते कोणत्यातरी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न असेल, तर मनसे गप्प बसणार नाही. आजचा मोर्चा शांततेत झाला असला तरी पुढीलवेळी संताप उफाळल्यास प्रशासन जबाबदार असेल.”
मनसेच्या या आंदोलनामुळे केडीएमसी (KDMC) प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांना यामधून काहीसा दिलासा मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.