डोंबिवली (शंकर जाधव) (KDMC)
कल्याण ग्रामीण (KDMC) विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दीर्घकाळापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येच्या तातडीच्या निवारणासाठी आमदार राजेश मोरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह एमआयडीसी अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या बैठकीत त्यांनी अमृत योजना आणि पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू यांना या गंभीर समस्येचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश दिले. मागील सहा महिन्यांत आमदार मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील समस्यांवर आयोजित केलेली ही चौथी बैठक होती. येत्या काळात पालिका आणि एमआयडीसीचे अधिकारी एकत्रित दौरा करून समस्यांचे प्रत्यक्ष निरिक्षण करणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीत आमदार मोरे यांनी सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या जागेबाबतही मागणी केली. यावर एमआयडीसीने सकारात्मक प्रतिसाद देत, ही जागा ट्रस्टला देण्यासाठी महसूल विभागासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच २७ गावांना वाढीव पाण्याचा कोटा देणे, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
पलावा, निळजे लोढा, देसलेपाडा परिसरातील नागरिकांना एमआयडीसीमार्फत मिळणाऱ्या पाणी बिलांची आकारणी निवासी दराने करण्याबाबतही त्वरित अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले.
या बैठकीस केडीएमसी (KDMC) आयुक्त अभिनव गोयल, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भरत भोईर, संतोष चव्हाण, बंडू पाटील, गणेश जेपाल, मोहन पाटील, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, सचिन म्हात्रे, सागर जेधे, विवेक खामकर, गजानन पाटील, अमोल भोगले, राहुल गणपुले, भरत काळू भोईर, सुभाष पाटील, सतरपाल सिंग, सुनील पवार, सतीश मोडक यांच्यासह पालिका आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.