गेल्या वर्षी (२०२४) मे महिन्यात घाटकोपर येथील महाकाय फलक (Ghatkopar hoarding collapse) दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खान याचा जामीन सत्र न्यायालयाने बुधवारी नाकारला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन पवार यांनी अर्शद खानचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अर्शद खान महाकाय फलक दुर्घटने नंन्तर सात महिन्यांपासून फरारी होता. डिसेंबर २०२४ अखेरीस लखनऊ येथून अर्शद खानला अटक करण्यात आली होती.
अर्शद खानने जामीन मागताना असा दावा केला की मूळ तक्रारीत आपले नाव नसतानाही राजकीय दबावाखाली या प्रकरणात आपल्याला अडकवले गेले. महाकाय फलक लावणाऱ्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी किंवा त्या फलकासाठी परवानगी देणाऱ्या सरकारी विभागाशी आपला काहीही संबंध नाही. तसेच, या फलकासाठी आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी आपण पोलीस आयुक्तांसोबत संगनमत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तपास यंत्रणेने या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला आरोपी केलेले नाही. त्यामुळे, हा तपास पक्षपाती आहे, असा दावा अर्शद खानने आपल्या अर्जात केला.
मुंबईतील घाटकोपरमध्ये 13 मे 2024 रोजी वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळला होता. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आणि जवळ 74 जण जखमी झाले होते.