जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. आता पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. खोऱ्यातील राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली आहे.
या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी केला आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानशी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचा बळी घेतला होता.
तथापि, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक वेळा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा हल्ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात झाला. त्यानंतर, महामार्ग आणि संवेदनशील भागात अतिरिक्त चौक्या उभारण्यात आल्या आहेत. प्रमुख प्रतिष्ठाने आणि पर्यटन स्थळांजवळ जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, गुप्तचर माहितीनंतर महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सैन्य दहशतवाद्यांचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ‘दहशतवादविरोधी मोहिमा’ सुरू करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत आणि त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा देताना म्हटले आहे की, ‘या दहशतवादी हल्ल्यात कोणाचा मुलगा शहीद झाला, कोणाचा भाऊ, कोणाचा जीवनसाथी मारला गेला.
हा हल्ला केवळ निशस्त्र पर्यटकांवरच नव्हता, तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘आज कोणीही असे समजू नये की आपल्या २७ लोकांना मारून त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वांना उत्तर दिसेल. त्यांना शोधून धडा शिकवला जाईल.