Pen : ७७ वर्षानंतर मिळालेला रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गेला वाहून!अधिकारी कंत्राटदारावर कारवाईची मागणी

माय मराठी
2 Min Read

पेण  (Pen)

कोरलवाडी (Pen)  आदिवासी वाडीला स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षांनी प्रथमच रस्ता उपलब्ध झाला. मात्र, अवघ्या २० दिवसांत हा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून, येत्या काही दिवसांत संपूर्ण रस्ता नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक आदिवासींचा हक्काचा रस्ता निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे फार काळ टिकू शकला नाही, यामुळे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांत संतापाचे वातावरण आहे.

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पनवेलचे अभियंता मिलिंद कदम आणि कंत्राटदार के. एन. घरत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी या अधिकाऱ्यांवर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

ठाकूर यांनी या प्रकल्पाच्या कामकाजावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी दोन वेळा बांधकाम अभियंत्यांचे लक्ष निकृष्ट दर्जाच्या कामाकडे वेधले होते. तसेच “आपले सरकार” पोर्टलवरही अधिकृत तक्रार नोंदवली होती. त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, केवळ २० दिवसांत नव्याने बांधलेला रस्ता पावसात नष्ट होऊ लागला आहे.

या रस्त्यासाठी जागा मिळवण्यासाठी आणि निधी संकलनासाठी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दहा वर्षे संघर्ष केला. मोर्चे, आंदोलने आणि उपोषणानंतर अखेर हा रस्ता मंजूर झाला होता. त्यामुळे हा रस्ता केवळ भौगोलिक नव्हे तर सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे.

संतोष ठाकूर आणि स्थानिकांनी आदिवासी विकास निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करून दोषींना जबाबदार धरले नाही, तर पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Share This Article
- Advertisement -
Ad imageAd image

ट्रेंडिंग बातम्या

View more

व्हिडीओ

View more