पेण (Raigad) (अरविंद गुरव)
रायगड (Raigad) जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी जिल्ह्यासाठी आयपीएस दर्जाच्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी सातत्याने केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, महाराष्ट्र शासनाने आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांची रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
या मागणीसाठी हरिष बेकावडे यांनी दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर अधिवेशन काळात आणि त्यानंतरही हा विषय त्यांनी सातत्याने पुढे नेला. विविध प्रसारमाध्यमांनीही या मागणीची दखल घेतली होती. आता शासनाच्या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे, असे बेकावडे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यात मटका, जुगार, डान्स बार, ड्रग्स, अवैध भंगार व्यापार, रेव पार्टी, बलात्कार, अपघात, खून, दरोडे अशा अनेक गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ झाली होती. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आयपीएस दर्जाच्या अनुभवी अधिकाऱ्याची नेमणूक होणे अत्यावश्यक होते.
आंचल दलाल यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवली जातील, असा विश्वास हरिष बेकावडे यांनी व्यक्त केला. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखत गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.