जागतिक व्यासपीठावर देशाची बाजू मांडणार
डोंबिवली ( शंकर जाधव )
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपल्या दहशतवादविरोधी भूमिकेचा स्पष्ट संदेश जगाला दिला आहे. आता या धोरणाचा प्रचार आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी भारताची सर्वपक्षीय ७ वेगवेगळी शिष्टमंडळे जगभर दौर्यावर जात आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची आखाती आणि आफ्रिकी देशांच्या दौऱ्यासाठी निवड झाली.
या शिष्टमंडळांचे नेतृत्व हे अनुभवी नेते करणार आहेत. यात शशी थरूर (INC) अमेरिका आणि युरोप, रवी शंकर प्रसाद (BJP), संजय कुमार झा (JDU), बिजयंत पांडा (BJP), कनिमोझी करुणानिधी (DMK), सुप्रिया सुळे (NCP) मध्यपूर्व, आणि डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना) आखाती आणि आफ्रिकी देशांचे नेतृत्व करणार आहेत. ही शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख देशांना भेटतील. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका जगासमोर मांडली असून, आता ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट करण्यासाठी संसदेचे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे प्रमुख देशांना भेटी देणार आहेत. १७ मे २०२५ रोजी संसदीय कार्य मंत्रालयाने याची घोषणा केली. ऑपरेशन सिंदूर, ज्याने ७ मे २०२५ रोजी पहलगाम हल्ल्याला (२६ मृत्यू) प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, याने भारताची शून्य सहिष्णुता धोरण जगासमोर ठेवले. आता ही शिष्टमंडळे भारताची दहशतवादविरोधी कृती आणि राष्ट्रीय एकमत यांचा संदेश जगभर पोहोचवतील. प्रत्येक गटात अनुभवी राजकारणी आणि कूटनीतिज्ञांचा समावेश आहे, जे भारताची बाजू प्रभावीपणे मांडतील.